बीड : ‘लोकमत’तर्फे बीड येथे २ जुलै रोजी ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या महारक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना रोडवरील बीड ब्लड बँकेत (पहिला मजला, हरिओम कॉम्प्लेक्स, द्वारकादास मंत्री बँकेशेजारी) सकाळी १० वाजता हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ बीडसह राज्यात १५ जुलै २१ पर्यंत रक्तदान शिबिरे होणार असून दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात येत आहे.
रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्बंध लागल्याने रक्तदान शिबिरे थांबली. परिणामी शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांत रक्ताचा पुरेसा साठा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोविड संकटाच्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांचीही गैरसोय होत आहे. अनेकांना रक्ताची गरज भासते. या परिस्थितीत वेळेत रक्तदाता मिळणे व त्याचा रक्तगट जुळविणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने कोणाला तरी जीवनदान अर्पण करू शकतो.
रक्तपेढ्यांना रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
यांनी करावे रक्तदान
१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती.
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.
परळी आणि अंबाजोगाई आदी ठिकाणी ही रक्तदान शिबिरे होणार आहेत. सामाजिक संस्था, पक्ष, संघटना, विविध मंडळे यांना जर रक्तदान शिबिरे घेऊन या महायज्ञात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर लोकमतशी संपर्क साधावा. जर आपण रक्त देण्यास इच्छुक असाल तर आपले नाव, नंबर, शहर, पत्ता या ९६५७१०२१७८ या नंबरवर व्हॉट्सॲप करा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.