...
बस सुरू करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे परगावी, परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. १ जूनपासून कडक निर्बंध घालून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
...
पेरणीची तयारी जोरात
कडा : आष्टी तालुक्यात कडा परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. उधार, उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेती मशागत केली आहे. आता खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
....
पिण्याच्या पाण्याची टंचाई
आष्टी : तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे.
...
रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंतेत
पाटोदा : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने भुईमूग पिकाची लागवड केली होती; परंतु तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने एका रात्रीत शेतकरी भुईमूग पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
...
रोजगार हमीची कामे सुरू करा
धानोरा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊन उठताच रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
...
डासांमुळे आरोग्य धोक्यात
बीड : शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात उकाडा वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच फवारणीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
...
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
धानोरा : परिसरात विहीर, बोअरवेलवरील मोटारी, केबल मोठ्या प्रमाणात चोरी जात आहे. अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरी गेले आहे. किरकोळ कारणासाठी शेतकरी चोरीची तक्रार देण्यास जात नाहीत; परंतु आर्थिक नुकसान शेतकऱ्यांंना सहन करावे लागत आहे. या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.