आ. नमिता मुंदडा यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाईत १८ जुलैपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. पीकविम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी शासनाने २३ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ही मुदत संपली असून, पिकांचे झालेले नुकसान पाहता नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग व विमा कंपन्यांना आपत्तीग्रस्त परिसरात तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत. त्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागवून तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करावा, अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेली आहे. तसेच शेतातील उभ्या पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची झालेली वित्तहानी भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांकडून तातडीने पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा हप्त्याची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली होती. यावेळी झालेली अतिवृष्टी, खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे असंख्य शेतकरी विमा हप्ता भरू शकले नाहीत. पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कोणत्या स्वरूपात कधी व कशी देण्यात यावी. तसेच कोणत्या मुदतीत देण्यात यावी, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कृषी विभागाने, तसेच विमा कंपनीने शेतकऱ्यांसोबत संपर्क व संवाद साधून माहिती देणे अत्यंत गरजेचे झाल्याचा मुद्दा आ. नमिता मुंदडा यांनी पत्रात नमूद केला आहे.
महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्व्हे करावा
केज विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी व पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. ग्रामीण भागातील अनेक शेत रस्ते या पावसामुळे वाहून गेले आहेत. हे शेत रस्ते दुरुस्ती करण्यासाठी तसेच नद्यांवर असणारे जुने पूल नवीन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. शहरी भागांपासून ग्रामीण भागाला जोडले गेलेले रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. त्या रस्त्यांची कामेही जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी केज मतदार संघाला निधी उपलब्ध करून द्या.
आ. नमिता मुंदडा