प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण
बीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारलेले हे निवारे शासकीय असतानाही त्याचा वापर अनेक ठिकाणी खासगी इमारतीसारखा होऊ लागला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
बांधकाम साहित्याचा नागरिकांना त्रास
बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
‘नो पार्किंग’चा अंमल करावा
माजलगाव : येथील बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजवारा उडाला आहे. सर्रास या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने, विक्रेत्यांचे गाडे लावलेले असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन
नेकनूर : येथील बाजारतळावर काही दिवसांपूर्वी सावलीसाठी झाडे लावण्यात आली आहेत. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडेदेखील जोमात आलेली आहेत, मात्र काही लोकांकडून ती झाडे तोडली जात आहेत. या झाडांपासून बाजारतळावर सावली तयार होईल, त्यामुळे झाडांचे संगोपन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच झाड तोडणाऱ्यावर कारवाईचा इशारादेखील दिला आहे.