हे आहेत निर्बंध
विनामास्क परवानगी देण्यात येऊ नये, शरीराचे तापमान तपासून प्रवेश देणे बंधनकारक राहील. पुरेशा प्रमाणात सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. संबंधित आस्थापनेने सामाजिक अंतर पाळणे व मास्क वापरणे हे पाहण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे, याची खात्री करावी. सिनेमागृह, रेस्टॉरंट, सर्व शॉपिंग मॉल्सनादेखील हे निर्बंध पाळावे लागणार आहेत. मंगल कार्यालये, फंक्शन हॉल यांना लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे, तर अंत्यविधीसाठी २९ व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.
गृहविलगीकरणास परवानगी
कोरोनाबाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणास निर्बंध पाळून परवानगी देण्यात आली आहे. गृहविलगीकरणाच्या ठिकाणी निदर्शनास येईल, अशा ठिकाणी १४ दिवसांसाठी कोविडबाधित रुग्ण असल्याचा फलक लावावा. आरोग्यविषयक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व कार्यालये ५० टक्के उपस्थितीत चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच धार्मिक संस्था व्यवस्थापनाने भाविकांच्या संख्येबाबत मर्यादा ठरवावी, तसेच ऑनलाइन आरक्षण सुविधा चालू करावी, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दूध विक्रेते, औषधालये वगळून) दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.