बीड : पीक विमा भरूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कंपनीने दिली नाही. विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी कोरोनाचे नियम पाळत शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर गावपातळीवर अनेक गावच्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन सरपंच व ग्रामसेवकांना दिले.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामेही केले होते. मात्र, विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यात आली नाही. यासंदर्भात गंगाभीषण थावरे यांनी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या मुुंबई कार्यालयातील महाप्रबंधकांना निवेदन दिले होते. यानंतर जिल्हाभरात बोंंबाबोंब आंदोलनही केले. दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असा शासनादेश निघाल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही दिली. शासन नुकसानभरपाई देत असताना विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ होत आहे. विमा कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले. बीड तालुक्यातील मौज, माजलगाव तालुक्यातील आनंदगाव, वडवणी तालुक्यातील कोठरबन, केज तालुक्यातील वरपगाव, अंबाजोगाई तालुक्यातील पूस, शिरुर तालुक्यातील मातोरी, आष्टी तालुक्यातील वाघोली येथे महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करत आपल्या मागण्याचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले.
===Photopath===
010621\01_2_bed_22_01062021_14.jpeg
===Caption===
महिला शेतकरी आंदोलन खडकवाडी येथे धरणे आंदोलन सोडवताना ग्रामपंचायत पदाधिकारी