यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण तलाव, धरण पाण्याने शंभर टक्के पूर्ण भरलेले आहेत. सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटबंधारे विभाग तेलगाव यांच्याकडे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. सध्या रब्बीची पिके जोमात असून पाण्यामुळे कोमेजून जाऊ लागली होती. यासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी गुळभिले तसेच मोजणीदार डी. डी. सावंत यांनी तत्काळ शेतकरी वर्गाकडून पाणी अर्ज भरून घेऊन पाणपट्टी भरून घेतली आणि पाटाला शेती भिजवण्यासाठी पाणी सोडण्यात आले. याचा फायदा पुसरा, हिवर गव्हाण, उपळी आणि बावी या गावांना होणार आहे. तसेच हे पाणी ज्वारी, गव्हू, हरभरा, नवीन ऊस लागवडीला होणार आहे, असे मोजणीदार डी.डी. सावंत यानी सांगितले.
पिकासाठी पाणी सोडल्याचा फायदाच
दोन एकर ज्वारी बहारात आली होती. त्यामुळे या परिस्थितीत पाण्याची खूप आवश्यकता होती. पाटाला पाणी आल्यामुळे आपण समाधानी झालो आहे. पीक चांगले येण्यास मदत होणार असल्याचे शेतकरी प्रकाश राठोड यांनी सांगितले.
पाणी मुबलक असल्याने सोडण्यास अडचण नाही
शेतकरी वर्गाची मागणी येताच पाणी अर्ज भरून घेऊन सध्या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे आणि तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पाणी सोडण्यास अडचण नाही. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे शाखा अभियंता गुलभिले यांनी सांगितले.