आष्टी : दिवसेंदिवस शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. परंतु रुग्ण घरी गेल्यानंतर त्याला पुन्हा त्रास होत आहे. तरी आरोग्य विभागाने विलगीकरण दहाऐवजी सतरा दिवस करावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी राज्याचे आरोग्य संचालक डाॅ. रामास्वामी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संक्रमित रुग्णासाठी गृृृृह विलगीकरणासाठी दहा दिवसांची मुदत दिलेली आहे. तथापि ग्रामीण भागात आम्ही केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून येत आले की, ग्रामीण भागातील रुग्णांची परिस्थिती पाहता, गृह विलगीकरणामध्ये दहा दिवस राहिलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा शारीरिक त्रास होत आहे. त्याचा संसर्ग पुन्हा अधिक बळावत असेल. यानंतर वीसपर्यंत स्कोर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यानुसार संक्रमित रुग्णाच्या गृह विलगीकरणाची मुदत आणखी किमान सात दिवस वाढवण्याची आवश्यकता आहे, असेही धस यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.