बीड : शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड ३१ जुलै २०२१ पूर्वी करून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
जिल्हा मध्सवर्ती बँक, व्यापारी बँकामार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्यात येतो. राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ संसर्गाच्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता १ जुलै २०२१ रोजीचे शासन निर्णयाद्वारे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँकानी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या वाढीव मुदतीत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरी डॉ. पंजाबराव व्याज सवलत योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र असतील.
सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीककर्जाची परतफेड ३१ जुलै २०२१पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करावी अन्यथा ३१ जुलै २०२१ नंतर त्यांचे पीक कर्ज खाते थकबाकीमध्ये गेल्यास अशा कर्ज खात्यावर ९ ते १२ टक्के एवढ्या जादा दराची आकारणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी केले आहे.