परळी : परळी आणि अंबेजोगाई उपविभागासाठी पूर्वी बीड आरटीओ परिक्षेत्र होते. त्यावेळी परळी वैजनाथ येथे आठवड्याला तीन वेळा आरटीओ कॅम्पचे आयोजन केले जात होते, परंतु जेव्हापासून अंबेजोगाई आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले, तेव्हापासून परळी येथील होणारे आरटीओ कॅम्प बंद करण्यात आले आहेत. हे कॅम्प पुन्हा नव्याने सुरू करावेत, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी राज्याचे परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, परळी उपविभागाचा विस्तार मोठा असून, परळी शहरासह यात १०९ गावांचा समावेश आहे. या उपविभागातून मिळणारा महसूलही मोठा आहे. या बाबी लक्षात घेता, अंबेजोगाई आरटीओ कार्यालयाने परळी वैजनाथ येथे आठवड्यातून तीन वेळा कॅम्पचे आयोजन केले, तर येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सोय होईल. शिकावू ड्रायव्हिंग लायसन्स, लायसन्सचे नूतनीकरण, वाहन नोंदणी या कॅम्पच्या माध्यमातून होईल व त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांची होणारी गैरसोय थांबेल. त्यामुळे परळी वैजनाथ येथे आठवड्यातील तीन दिवस आरटीओ कॅम्प घ्यावा, अशी मागणी बियाणी यांनी परिवहनमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.