जातेगाव : गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी शिवारात शनिवारी झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू अपघात नसून, त्याचा जुन्या भांडणातून विजेचा करंट देऊन खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सोमवारी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंड टाकळी शिवारात शनिवार (ता. ७) रोजी संदीप सोपान चव्हाण (वय १५) या विद्यार्थ्याचा शेजारील किशोर लोंढे यांच्या ऊस फडात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. वन्य प्राण्यांकडून उसाची नासाडी होत असल्याने भेंड टाकळी येथील शेतकरी लोंढे यांनी ऊस फडाच्या चोहोबाजूने तारेचा विळखा घालून रात्री दररोज या तारेत वीज प्रवाह सोडण्यात येत होता, अशी माहिती मिळाली. संदीप चव्हाण यास ऊस खायचा मोह झाल्यावर तो ऊस फडात ऊस मोडत असतानाच त्याचा तारेला स्पर्श होताच, विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला, परंतु घटना बांधाच्या कडेला घडली असताना संदीपचा मृतदेह पन्नास फूट अंतरावर पाचरटात झाकून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्याने, हा अपघात नसून त्याचा घात झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबीयांना आला, शिवाय रोज रात्री वीज प्रवाह सोडण्यात येत होता. शनिवारी मात्र सायंकाळी लवकरच सोडला, असे बोलले जात होते.
दरम्यान, सोपान चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्या शेत बांधाला बांध असल्यामुळे बांध कोरण्यावरून या दोघांत नेहमीच कुरबुरी होत असत. याचा राग धरून संदीप चव्हाण याचा विजेचा धक्का देऊन खून केल्याचा आरोप राजेंद्र बंकट चव्हाण यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार, तलवाडा पोलीस ठाण्यात किशोर विठ्ठल लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, आकाश भगवान लोंढे, बाळू बळीराम लोंढे आणि सोमनाथ भगवान लोंढे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने अधिक तपास करीत आहेत.