कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहानथोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य शेतात जातात. नेमकी हीच संधी साधून सराईत चोरटे बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोऱ्या करत आहेत. मात्र या घटनांतील चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
आष्टी पोलिस ठाण्यांतर्गत चिंचपूर येथील शरद गोंदावले याच्या घरी ७ जुलै रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून भरदिवसा घरात घुसून घरातील पाच तोळे सोने व १ लाख ६० हजार रोख तर, अंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत कुंभेफळ येथे १९ जुलै रोजी भरदुपारी योगेश सुभाष गाडे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आठ तोळे सोने व एक लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे आठ दिवसांच्या फरकाने हे चोरीचे प्रकार घडल्याने व पोलिसांना अद्याप कसलाच मागमूस लागला नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रात्री-अपरात्री नव्हे तर भरदिवसा चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यात आजवर अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोऱ्यांचा तपास बोटावर मोजण्याइतकाच लागला आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. अन्य तीन ठिकाणीही चोऱ्या झाल्या. पण ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. याच आठवड्य़ात मेहकरी, सराटेवडगाव, टाकळी अमिया या ठिकाणीदेखील दिवसाच चोऱ्या झाल्या आहेत. परंतु संबंधित पोलीस ठाण्यात कसलीच तक्रार दाखल केली नाही. दिवसा घरफोडीचे सत्र कधी थांबणार व चोरटे पोलिसांना सापडतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ठाणे हद्द परिसरात नाकेबंदी, गस्त, त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशन मोहीम हाती घेतली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.