धारूर : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सकारात्मक व चांगल्या विचारांतून कुठल्याही संकटावर मात करता येते, असे प्रतिपादन प्रकाश महाराज साठे यांनी केले. येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर कोरोना रुग्णांसाठी आयोजित कीर्तन सेवेत त्यांनी प्रतिपादन केले.
कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे मोफत कीर्तन करतात. धारूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरवर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी साठे महाराज यांची आठवी कीर्तन सेवा होती. आपल्या कीर्तन सेवेत त्यांनी रुग्णांना मानसिकदृष्ट्या खंबीर करणारे विचार मांडले. राष्ट्रसंत तुकारामांचा अंभग कीर्तनासाठी घेतला. साठे म्हणाले, कोरोना संकट ही जागतिक महामारी आहे. या काळात विचार सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. आजार हा विचारांवर अवलंबून असतो. चांगले विचार ठेवल्यास सर्व परिस्थितीवर मात करता येते, असे ते म्हणाले. कीर्तनामध्ये चांगल्या विचाराचे टाॅनिक मिळते. जसे आपण विचार करतो, तसे घडत जाते. त्यामुळे चांगले विचार सतत करा. या कोरोना महामारीने कुणाचे कुणी नाही हे पुन्हा एकदा दाखविले आहे. संतांचे अभंग बरेच काही शिकवतात. त्यामुळे संतविचारांच्या मार्गावर चालत रहा, सकारात्मक विचार करा. यातूनच आपण या संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी दिला. साठे महाराज यांनी कीर्तन सेवेतून प्रबाेधनाबरोबरच श्रोत्यांचे मनोरंजन केले. कीर्तनसेवा यशस्वी करण्यासाठी नितीन शिनगारे, हर्षवर्धन अंडील, सुहास तपसे, ऋषीकेश ढगे, सुरेश शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. सर्व कोरोना रुग्णांनी या कीर्तनाचा लाभ घेतला.