बीड : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत सहभागी झालेल्या श्रीमंत आणि आयकर भरणाऱ्या ३१ हजार ३५२ शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी फक्त २७८९ जणांनी पैसे परत केले असून, २८ हजार ५६३ करदात्या शेतकऱ्यांनी पेन्शनची रक्कम परत केलेली नाही.
जिल्ह्यामध्ये ५ लाख ७७६ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा सर्वांना लाभ मिळाला होता. मात्र, यापैकी काही शेतकरी हे श्रीमंत होते तसेच करदातेदेखील होते. तरीदेखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर राज्यभरात तसेच देशभरात अशा सर्व शेतकऱ्यांना मिळालेले योजनेतील पैसे परत करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील ३१३५२ शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा जिल्हा प्रशासनाने पाठवल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त २७८९ शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत पैसे परत भरले आहेत. तर, उर्वरित २८ हजार ५६३ शेतकऱ्यांनी पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा दाखवला आहे.
तहसील प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर २७८९ शेतकऱ्यांनी आतापर्यंत २ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये जमा केले आहेत; तर, अद्याप १९ कोटी २० लक्ष २ हजार जमा होणे बाकी आहे. या सर्वांना वेळोवेळी नोटीस देऊन सूचना करण्यात आलेली आहे. दरम्यान, पुढील काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
आतापर्यंत २ कोटी ६५ लाख वसूल
पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपली नावे योजनेत दाखल करून घेतली होती.
आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील ३१ हजार ३५२ पैकी फक्त २७८९ शेतकऱ्यांनी रक्कम जमा केली आहे.
शेतकऱ्यांनी आतापर्यंत फक्त २ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये जमा केले असून, अद्याप १९ कोटी २० लाख २० हजार रुपये जमा होणे बाकी आहे.
२९ हजार ३३१ लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही.
या योजनेत पात्र असूनदेखील अद्याप २९ हजार ३३१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर, काही शेतकऱ्यांचे पैसे नेमके कुठे जातात, हे कळू शकले नसून, काही शेतकरी नसलेल्यांच्या खात्यावरदेखील पैसे जमा झाल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील अद्याप त्यांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला नाही. तर, नोटीस पाठवलेल्यांपैकी बहुतांश नोकरदार वर्गातील असल्याचे चित्र आहे.
पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसान योजनेचे लाभार्थी
५,२३,७७६
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी
२७८९
पैसे भरा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी
३१,३५२
पैसै परत करणे बाकी असलेले शेतकरी
२८,५६३
ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानादेखील या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना तहसील प्रसासनाकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी नोटीस मिळताच रक्कम जमा केली आहे. तर, अनेकांकडून जमा करण्यास विलंब केला आहे. अशा शेतकऱ्यांना वेळोवेळी नोटीस पाठवून सूचना केल्या आहेत. पुढील काळात शासन निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल
निवासी उपजिल्हाधिकारी, बीड