अमरावती : रघुवीरमध्ये खाद्यान्न तयार करण्यापूर्वी भाजीपाला आदी वस्तू धुण्याची आणि भांडी धुण्याची जागा एकच असल्यामुळे खाद्यान्नात गंभीर संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. रघुवीरच्या कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी श्याम चौकातील प्रतिष्ठानावर धाड टाकली. तेथील व्यवस्थेची आणि खाद्यान्न तयार केले जाणाऱ्या जागेची तपासणी केली. त्यांनादेखील रघुवीरचे कामकाज एफडीएच्या नियमावलीप्रमाणे चालत नसल्याचे लक्षात आले. खाद्यान्न निर्मितीसाठी राबणाऱ्या कामगारांची नियमानुसार ठराविक कालावधीत वैद्यकीय तपासणी न होणे, धूर हवेत सोडण्यासाठी चिमणीची उपाययोजना न करणे, खाद्यपदार्थ हाताळताना अत्यावश्यक असलेले हॅन्डग्लोव्हज् न वापरणे, बेसिनजवळच खाद्यान्न निर्मितीसाठचा कच्चा माल ठेवणे, आदी ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या नियमबाह्य बाबींची अन्न औषधी प्रशासनाने नोंद घेतली होती. विश्वासाने लहान मुलांनाही ज्या रघुवीरचा नाश्ता अमरावतीकर खाऊ घालायचे, तो तयार करताना इतकी अस्वच्छता, अनारोग्यता असते, याचे सामान्य ग्राहकांना भानही नसावे. या गंभीर प्रकरणानंतरही एफडीएने कठोर कारवाई अद्याप केलेली नाही. कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आदी नाश्ता तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल , जसे - पालक, सांबार, बटाटे, मिरच्या त्याजागी धुतला जातो, जेथे काही वेळापूर्वीच खरकटी भांडी घासली गेलेली असतात. ग्राहकांनी नाश्ता केल्यानंतरच्या उष्ट्या आणि खरकट्या प्लेट, चमचे तसेच गंज त्याजागी धुतले जातात. त्याजागी असलेल्या अन्नाच्या कणातून जीवघेणे संक्रमण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शुद्ध आणि दर्जेदार नाश्ताचा दावा केला जात असला तरी अशुद्ध आणि अळीयुक्त नाश्ता चढ्या भावात विकणाऱ्या ‘रघुवीर’ला एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांचे अभय का? (प्रतिनिधी) अहवालाची प्रतीक्षा ४एफडीए अधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबर रोजी रघुवीर प्रतिष्ठानात धाड टाकून तेथील खाद्यान्नाच्या कच्चा मालाचे नमुने घेतले. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले असून त्या अहवालावरून पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. अमरावतीकरांना त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एफडीए निगरगट्टच ४रघुवीरची श्याम चौक, राजापेठ व गाडगेनगर रोडवर अशी तीन प्रतिष्ठाने आहेत. सातुर्णा परिसरात मिठाई बनविण्याचा कारखाना आहे. श्याम चौक स्थित प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्यावर एफडीएने सर्वच प्रतिष्ठानांवर छापे मारुन नमुने गोळा करणे व अन्न सुरक्षा मानदांच्या अंमलबजावणीची तपासणी करणे, कर्तव्याचा भाग होता. अजूनही ते पार पाडले गेले नाही.
भांडी धुण्याच्याच जागी धुतला जातो भाजीपालाही
By admin | Updated: September 24, 2016 01:18 IST