उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संघटनेने नोंदविला निषेध
चांदूर रेल्वे : लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होऊन उपासमारीची वेळ येत असून, या लॉकडाऊनला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवून निषेध व्यक्त केला आहे. याबाबतचे निवेदन चांदूर रेल्वे येथील व्यापारी संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना मंगळवारी दिले.
मंगळवारपासून अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे आश्चर्य होत असल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे. मागील लॉकडाऊनच्या काळातील नुकसानातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना, पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांचे कंबरडे पूर्णत: मोडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे लहान व्यापाऱ्यांची अक्षरश: उपासमार होण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ लहानसहान व्यापाऱ्यांवर येऊ शकते. यामुळे लॉकडाऊनचा निषेध करीत असल्याचे निवदेनात नमूद करण्यात आले.
सोमवार ते शुक्रवार किमान सकाळी ९ ते ३ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चांदूर रेल्वे येथील व्यापारी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन, मदन कोठारी, छोटू विश्वकर्मा, जितू जैन, सुनील वानखडे, सचिन वर्मा, प्रभाकरराव भगोले, संजय कोल्हे, प्रताप खंडार, विनोद अग्रवाल, संजय जैन यांसह अनेकांची उपस्थिती होती.