बेनोडा (शहीद) : स्थानिक गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी पुरेशी कामे उपलब्ध नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. योजनेतून कामांना तत्काळ मंजुरी देऊन मजुरांवरील उपासमार थांबवावी, या मागणीचे निवेदन विनोद ठवरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
बेनोडा गावात एम.आर.ई.जी.एस. योजनेतील जाॅबकार्डधारकांची संख्या अडीच हजार असून शंभर मजुरांनी काम मिळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे. सद्यस्थितीत १५ मजुरांना कामावर घेतल्याने इतरांच्या हाताला काम नाही. एवढ्या मोठ्या योजनेत काम करायला मजूर तयार असताना केवळ प्रशासकीय अडचणीमुळे काम उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रारीची दखल घेऊन त्वरित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, मजुरांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.