सामान्यांची बल्ले-बल्ले, गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना
अमरावती : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द केली, मात्र शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धोरण जाहीर केले. या नव्या धोरणाने सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. तथापि, गुणी विद्यार्थ्यांवर या धोरणाने अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
१०० टक्क्यांपैकी ५० टक्के गुण अंतर्गत मू्ल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांनुसार देण्यात येतील. कोरोना संसगार्मुळे शाळा-महाविद्यालये बंद असून, अभ्यासही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. शालेय जीवनात दहावीचे वर्ष ‘टर्निंग पॉईंट’ असताना, नेमकी हीच परीक्षा रद्द करून मूल्यमापन करण्यात येत आहे. या धोरणामुळे गुणी विद्यार्थी मात्र व्यथित झाले असून, त्यांचे पालकही नाराज झाले आहेत. अभ्यासात ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्यांना या नव्या धोरणामुळे पुढील वर्गात ढकलले जाणार आहे, हे मात्र खरे. शालेय शिक्षण विभागातही दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निर्णयावर संंमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
------------------
बॉक्स
असे असेल नवे सूत्र
नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण मिळून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.
-------------------
अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक
दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे. ती पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमाच्या अधारावर असेल. याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तासांची घेण्यात येणार आहे.
---------------------
विद्यार्थी खूश
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने हिरमोड झाला. ना वर्ग, ना अभ्यास. ऑनलाईन शिक्षणातून काहीही साध्य झाले नाही. दहावी निकालाचे अंतर्गत मूल्यांकनाचे धोरण विद्यार्थिहिताचे असल्याची भावना दहावीची विद्यार्थिनी नंदिनी मराठे हिने व्यक्त केली. अंतर्गत मूल्यमापनाच्या धोरणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झालेला नाही. समानतेचे धोरण लागू केल्याबाबत ऋणी असल्याचे विद्यार्थी अल्पेश वानखडे म्हणाला.
--------------------
पालक काय म्हणतात?
परीक्षाविना उत्तीर्ण ही बाब गुणी विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करेल. चांगले गुण मिळवित नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे सर्वसामान्य कुटुंबातील अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
- रजनी देशपांडे, अमरावती.
कोरोना संकटामुळे शालेय शिक्षण विभागाला दहावीची परीक्षा रद्द करावी लागली. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
- राजेश सपकाळे, अमरावती.
------------
जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी : ४०६३३
मुली : १९३१८
मुले : २१३४५
-----------------
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?
काेरोना संसर्गामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती. मात्र, कोरोनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला. मूल्यांकनाच्या धोरणाने दिलासा मिळाला.
- सुरेश मोलके.
----------------
‘‘
- अरविंद मंगळे
-----------
दहावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, असे मी म्हणणार नाही. मात्र, नक्कीच काही गुणी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत काहीअंशी बाधा येणार, असे चित्र आहे. तथापि, पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी सीईटी हा पर्याय उपलब्ध आहे.
- प्रशांत कोल्हे.