सुमित हरकूट - चांदूरबाजारतालुक्यातील पूर्णा प्रकल्पावरील इलेक्ट्रीशियनचे पद मागील १० वर्षांपासून रोजंदारीवर भरण्यात आल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पूर्णा नदीमुळे जिल्ह्यातील ११० गावांची तहान शांत होते. सोबतच हजारो हेक्टर जमिनीचे सिंचन होते. पूर्णा नदीवर विश्रोळी येथे पूर्णा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. या धरणामुळे तालुक्यात हरितक्रांती झाली. मात्र, या प्रकल्पावर तांत्रिक कामकाजासाठी सुरेश माणिक धोटे (रा. घाटलाडकी) नामक एका इलेक्ट्रीशियनची नियुक्ती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ते धरणावरच काम करीत आहे. पूर्वी ७ वर्षे त्यांनी एका खासगी कंपनीत तांत्रिक काम केले. त्यांना पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अगदी तोकड्या रोजंदारीवर कामावर घेतले. परंतु या धरणावर गलेलठ्ठ वेतनाची उचल करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा अति महत्त्वाचे असलेले इलेक्ट्रीशियन हे पद अद्यापही रोजंदारी पगारावरच सुरू आहे. पूर्णा धरणावर ९० टक्के कामकाज हे विद्युतवर चालणारेच असून यामध्ये धरणाचे दरवाजे उघडणे-बंद करणे, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचा उपयोग तसेच विजेचा दाब हा कमी-जास्त होत असल्याने धरणावरील फ्युज नेहमी उडतात. यामुळे ही सर्व तांत्रिकी कामे धरणावर कार्यरत एकमेव कर्मचारी सुरेश धोटे मागील १० वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. हलाख्याची परिस्थिती तसेच नवीन शिकण्याची जिद्द मनात असल्यामुळे मजबुरीत सुरेश धोटे हे काम करीत आहेत. दररोज सकाळी सायकलने ये-जा करणारे धोटे हे जीव मुठीत ठेऊन नियमित धरणावर पोहचतात. त्यांचा धरणावरील दीर्घ अनुभवामुळे स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे आजवर या धरणावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र अशीच स्थिती किती दिवस राहील, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.यावेळी धरणाचे दरवाजे २ मीटर उघडत असताना अचानक ४ नंबरच्या दरवाजाचा फ्युज उडाला. ही बाब सुरेश धोटे यांच्या लगेच लक्षात येताच त्यांनी अवघ्या दोन मिनिटांतच धावत जाऊन फ्युजची दुरूस्ती करून धरणावरील दरवाजा उघडण्यास सुरूवात केली. सुरेश धोटे यांच्या सतर्कतेने धरणावरील वाढत असलेली पाण्याची पातळी कमी करण्यास मदत मिळाली. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या जलसाठ्यात प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाली होती. सुरेश धोटे यांनी सतर्कता बाळगली नसती तर कदाचित धरणातील पाण्याने अनेक गावे वाहून गेली असती. धरणावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच घेतलेला निर्णय तसेच धोटे यांच्या समयसुचकतेमुळे संभाव्य धोका टळला. या ५० वर्षीय सुरेश माणिक धोटे गेल्या १० वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर धरणावर इलेक्ट्रीशियन म्हणून काम करीत आहे. अगदी तोकड्या (५ हजार रुपये) पगारावर आपली उपजीविका भागवणारा हा तांत्रिकी कर्मचारी कधी शासनाचा कर्मचारी होणार तसेच वयोमर्यादेनंतर शासनातर्फे त्यास कोणती सुविधा देण्यात येईल, अशा अनेक प्रश्नांनी निरुत्तर झालेले सुरेश धोटे आज १० वर्षांनंतर इमानदारीने नोकरी करून ही शासकीय सुविधांपासून उपेक्षितच आहेत.
पूर्णा प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात
By admin | Updated: August 24, 2014 23:12 IST