वरुड :- तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगामध्येच पेरणी करून घेतली. परंतु गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पीक झिमायला लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेलं तर आलाच नाही यानंतरचे नक्षत्र कोरडेच गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन, आदी पिकांची पेरणी झाली. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक कोमेजू लागले. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आकाशाकडे ''आ'' वासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. काही शेतकरी दुबार पेरणीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पाऊस नसल्याने उन्हाळ्यासारखा उकाडा निर्माण होऊन तापमानसुद्धा वाढले होते. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनासुद्धा गारवा मिळाला.