श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराअमरावती ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक झाले. बडनेरा हे पूर्वीपासूनच जंक्शन आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. बडनेऱ्याहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरिता रेल्वे गाड्यांची सोेय असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी या दोन्ही स्थानकांवरून ये-जा करतात. प्रवाशांशिवाय या दोन्ही स्थानकांवर भिकारी, भामटे, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचासुध्दा मोठा वावर असतो. मात्र या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक फलाटावरील कचरा, दुर्गंधी व पानाच्या पिचकाऱ्यांकडेच आधी लक्ष वेधले जाते. रेल्वे प्रशासन नाही म्हणायला आपल्यापरीने स्वच्छतेकडे लक्ष पुरविते. परंतु प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या या स्थानकाचे मूळ रूप कायम ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता साफसफाईची नैतिक जबाबदारी प्रवाशांचीदेखील नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कचरा कंटनेरचा वापर करण्यास टाळाटाळबडनेरा रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांचे आवागमन होते. रेल्वे स्थानक म्हटले की, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वर्दळ आलीच. बडनेरा जंक्शनवर प्रवेश करताच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विशिष्ट लयबद्ध आरोळ्या कानावर पडतात. प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या गदारोळात या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही लगबग सुरू असते. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. परंतु पदार्थांवरील प्लास्टिकचे आवरण, चहाचे ग्लासेस, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, उरलेले खाद्यपदार्थ, नासलेले अन्नदेखील चक्क रेल्वे ट्रॅकवर टाकले जातात. वास्तविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने कचरा कंटेनरची सोय केली आहे. मात्र, प्रवाशांकडून आणि व्यावसायिकांकडूनही या कचरा कंटेनरचा वापर पाहिजे तसा केला जात नाही. प्रवाशांनी हा कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची तसदी घेतल्यास रेल्वे फलाटांवरील साफसफाईचा ५० टक्के प्रश्न आपोआपच सुटू शकतो, हे मात्र निश्चित.
रेल्वे स्थानक की कचऱ्याचे आगार?
By admin | Updated: July 12, 2014 00:40 IST