देखभालीचा करार : भजदई - सावलमेंढ्याशी जोडली स्वयंचलित यंत्रणा सुरेश सवळे ल्ल चांदूरबाजारधरण जेवढं जीवन जगण्याला फायदेशीर ठरतं तेवढंच ते मरणालाही कारणीभूत ठरतं,याचा प्रत्यय गेल्यावर्षी २७ जुलैच्या सकाळी ११ ते १ वाजता दोन तासात पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावांना आणून दिला होता. याचा सर्वाधिक फटका पूर्णा धरणानजीकच्या ब्राम्हणवाडा (थडी) व देऊरवाडा या गावांना बसला होता. या प्रलयात दोन जीव गेले तर १०० कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. या घटनेला दोन्ही प्रशासनातील समन्वयाचा अभाव जितका दोषी असला तितकाच दोष धरणस्थळावरील कार्यान्वित नसलेली संगणकीय स्वयंचलित प्रणाली व धरणामागे असलेल्या ‘बापजई’ येथील अचानक झालेली ‘ढगफुटी’ हे सुद्धा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. धरणाची निर्मिती केली जाते. मात्र त्याच्या देखभालीवर करण्यात येणाऱ्या खर्चासाठी निधीची उपलब्धता केली जात नाही. याचा प्रत्यय पूर्णा प्रकल्पावरील आतापर्यंत नादुरूस्त असलेल्या स्वयंचलित संगणकीय प्रणालीवरून दिसून आले. गेल्या वर्षीच्या कटू अनुभवाची गंभीर दखल पाटबंधारे विभागाने यावेळी घेऊन पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावासाची पूर्वसूचना देणारी स्वयंचलित संगणकीय यंत्रणा पूर्णा प्रकल्प स्थळावर कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या देखभालीसाठी मेकॅट्रॉनिक्स कंपनी पुणे यांचेसोबत अप्पर वर्धा डॅम डिव्हीजन या विभागाने सन २०१९ पर्यंत करण्यात आला आहेत. या करारात जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्प व अप्पर वर्धा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यप्रदेशातील भगदई येथे पूर्णा नदीचा उगम आहे तर सावलमेंढा येथे या धरणाचे मध्य केंद्र आहे. गेल्या वर्षी भगदई येथे झालेला मुसळधार पाऊस व बापजई येथे झालेली ढगफुटी यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत २ तासांत ५० सें. मी. पासून तर ३ मीटर धरणाची दारे उघडल्या गेली. यातून दर सेकंदाला २४७६ घनमीटर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे महाप्रलय निर्माण झाला आणि त्यात जीवितहानीसह कोट्यवधींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.पूर्णा धरणस्थळावरील स्वयंचलित संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीची माहिती या प्रणालीवर क्षणात प्राप्त होणार आहे. या प्रणालीवर देखभालीसाठी कंपनीकडून कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून याठिकाणी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहतील.- आशिष राऊत,सहायक अभियंता, पूर्णा प्रकल्प.गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी पूर्णा प्रकल्पावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. सध्या धरणातील जलपातळी ४४६.६६ मीटर इतकी असून २२.३२ द. ल.घ.मी. जलसाठा आहे. याची टक्केवारी ५३.४४ इतकी आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या नाही. - सागर चौधरी,सहायक अभियंता,पूर्णा प्रकल्प.
पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्णा प्रकल्प यंत्रणा सज्ज
By admin | Updated: June 3, 2015 00:32 IST