अमरावती : पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धिकरण तसेच हातपंपाचे शुद्धिकरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व जलकुंभ टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धिकरण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन व पूर्वतयारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे. ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ व हातपंप शुद्धिकरण टी.सी.एल. साठवणूक नमुना तपासणी, साथीचे आजार, आदी विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
बाॅक्स
८४० ग्रामपंचायती राबविणार उपक्रम
आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता विविध साथरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गावागावांतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी जलसुरक्षा रक्षक व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छतेचा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम ८४० ग्रामपंचायतींमध्ये राबविला जाणार आहे.