अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३,८३२ नागरिक संक्रमणमुक्त झालेले आहेत. ही टक्केवारी ९७.८६ इतकी असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. दरम्यान आठ हजारांवर ॲक्टिव्ह रुग्णांचा उच्चांकी झाल्याने संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का घसरला होता. मात्र, या लाटेला ओहोटी लागताच पुन्हा संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का वाढला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १ जानेवारीपासून जिल्ह्यात ७६ हजार ११५ संक्रमितांची रुग्णांची नोंद झाली, तर याच कालावधीत ७४ हजार ८११ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात २२ एप्रिल २०२० रोजी पहिल्या संक्रमणमुक्त नागरिकांची नोंद झाली होती. या कालावधीत १५ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांची दोनवेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात यायची. दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आल्यासच रुग्णाला सुटी दिली जायची. यानंतरही किमान एक आठवडा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागत असे. त्यानंतर सुधारित गाईडलाईनुसार दहाव्या दिवशी व आता सहाव्या ते सातव्या दिवशी संक्रमिताला डिस्चार्ज दिला जात आहे. त्यानंतर त्याने किमान १४ दिवशी गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पाईंटर
असे झाले संक्रमणमुक्त
१ जानेवारी : १९०२१
१ फेब्रुवारी : २१,९७९
१ मार्च : २९,५३१
१ एप्रिल : ४४,९१३
१ मे : ५७,५९६
१ जून : ८६,४५७
२७ जून : ९३,८३२
बॉक्स
रविवारी ७२ रुग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यात रविवारी उपचारदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या १,५५० झालेली आहे. याशिवाय नव्या ३६ पॉझिटिव्हची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९५,८८३ झालेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने रविवारी ७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयासह होम आयसोलेशनमध्ये ५०१ रुग्ण असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.