अमरावती : जिल्ह्यात सोमवारी २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले व तीन रुग्णांचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार २६८ झाली आहे. महापालिका क्षेत्रात २६ हजारांवर रुग्णांची नोंद ही चिंताजनक बाब आहे.
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दोन दिवसांत संक्रमितही घटले. मंगळवारी १,२७४ नमुन्यांच्या चाचणीतून २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, पाॅझिटिव्हिटी कमी झालेली नाही. २२.१३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी मंगळवारी नोंदविली गेली. विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ करण्यात आल्याने आता १६०० चाचण्यांची तपासणी होईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले असले तरी रविवारी सुटीचा दिवस असल्याने काही चाचणी नमुने केंद्रे बंद होती.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारात पुन्हा गर्दी वाढली आहे. तथापि, पॉझिटिव्हिटी २३ टक्क्यांपर्यंत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर आता २० पथकांद्वारे दंडात्मक कारवायांची मोहीम जिल्हा प्रशासन राबवित आहे. त्यातही पथकप्रमुख दांडी मारून सहायकांना पाठवत असल्याचे दिसून आले.
बॉक्स
मंगळवारी तीन मृत्यू, ८५३ डिस्चार्ज
* जिल्ह्यात २४ तासांत अमरावती शहरात राठीनगरातील ७३ वर्षीय महिला, करुणनगरातील ७३ वर्षीय पुरुष व अचलपूर तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५७२ वर पोहोचली आहे.
* मंगळवारी ८५३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले. सद्यस्थितीत संक्रमनमुक्त रुग्णांची संख्या ३३,८२१ झाली आहे. सध्या रुग्णसंख्या वाढल्याने रिकव्हरी रेट घटून ८३.९९ टक्क्यांवर आला आहे.
बॉक्स
बाहेर पडलेल्या रुग्णांना ७५ हजारांचा दंड
महापालिका आयुक्तांचे निर्देशानुसार होम आयसोलेशनमधील रुग्णांची तपासणी डॉ. सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असता, तीन रुग्ण घरी आढळले नाहीत. या रुग्णांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड करण्यात आला. हमालपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. यापुढे एफआयआर नोंदविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत