श्यामकांत पाण्डेय - धारणी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसह भाजपच्या नमो फॅक्टरने देशात इतर पक्षांचे पानिपत केले. अमरावती लोकसभा मतदार संघातही ‘अडसूळ मजबुरी है मोदी जरुरी है’ या फॅक्टरचा प्रभाव पडला. नमो लहरचा मेळघाट विधानसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव जाणवला नाही. याउलट २00९ पेक्षाही जास्त मताधिक्य आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना देऊन आजही मेळघाटात काँग्रेस पक्षालाच पहिली पसंती दिली गेली. मेळघाट विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून सध्या काँग्रेसचे केवलराम काळे आमदार आहेत. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपची सोडचिठ्ठी घेत नवनीत राणा यांच्याकरिता खुलेआम प्रचारात सहभाग घेतला. त्यांनी एकीकडे दम मारून राणा यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न चालविला असताना काँग्रेसचे काही नेते आतून राणांच्या मतात भर घालण्याऐवजी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मेळघाटातून मताधिक्य मिळवता आले नाही. तरीही २00९ मध्ये रिपाइंचे गवई यांना अडसुळांपेक्षा ५९३७ मताधिक्य प्राप्त करता आले. त्या मानाने यंदा हे मताधिक्य चार पटीने जास्त म्हणजेच २१,४९६ मते मिळवता आले तेही मोदी लहर असताना. मेळघाट मतदारसंघ सदैव काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणा बाळगणारा मतदारसंघ आहे. येथे आजही इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांचा आदर्श जपला जातो. परंतु येथील नेत्यांची आपसातील मतभेद व स्वार्थी राजकारणाने काँग्रेसला वर येऊ दिले नाही. येथील काँग्रेस, राकाँची प्रवृत्ती सामान्य जनतेला घातक ठरत आहे. २0१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. या लाटेने जिल्ह्यातील मतदारांना आकृष्ट केले व एकदा संधी देऊन पाहू, असा विचार केला. पण मेळघाटने राकाँच्या नवख्या उमेदवारालाही भरभरुन मते दिली. येथील काँग्रेस, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी प्रामाणिकता दाखविली असती तर मेळघाटचे मताधिक्य ५0 हजारांच्यावर राहिले असते, असे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. याचा फटका मात्र विधानसभेत बसू नये याची काळजी आमदार केवलराम काळे यांना घेणे आवश्यक झाले आहे.
मोदी लाटेत सोडली नाही मेळघाटने आघाडीची साथ
By admin | Updated: May 25, 2014 23:15 IST