शेजारच्या गावातील शिवारात मंडप : नऊ जणांविरूद्ध गुन्हे
धारणी : तालुक्यातील तातरा गावातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा विवाह मंगळवारी दुपारी राजस्थान येथील ३० वर्षीय युवकाशी अंबाडी शिवारात पार पडणार होता. त्याची माहिती आदिवासी संघटनेच्या पदाधिकाºयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तो विवाह उधळून लावला.
तातरा गावातील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने अल्पवयीन मुलीचा विवाह राजस्थान येथील योगेश शांताराम पालके (२५) याच्याशी करण्याचे ठरविले होते. आई-वडिलांनी गावात विवाह न करता अंबाडी गावातील एका दाम्पत्याच्या घरी मुलीला आणले व त्यांच्या शेतात मंगलवारी विवाह करण्याचा बेत आखला. त्यानुसार, नवरदेव योगेश शांताराम पालके, वडील शांताराम फकिराम पालके (६८), आई कुसुम शांताराम पालके, भाऊ उमेश पालके (३०, सर्व रा. राजस्थान) हे मंगळवारी दुपारी ३ वाजता शेतातील विवाहस्थळी पोहोचले. तेथे दोन्ही पक्ष व ब्राम्हणाच्या उपस्थितीत विवाह सुरू झाला.
दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी मालती कासदेकर व संदीप तोटे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धारणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे, कॉन्स्टेबल वसंत चव्हाण यांनी दोन्ही पक्षांकडील नातेवाईक, भटजी व तेथील लग्नसाहित्य जप्त केले. याप्रकरणी पानखाल्या येथील ग्रामसेवक रेखा खवले यांनी धारणी पोलिसांत फिर्याद दाखल केली. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यात वर-वधूंचे आई वडील, भाऊ, शेतमालक व भटजींचा समावेश आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आदिवासी संघटनेचे हिरालाल मावस्कर, दिलीप जावरकर, राजू पतोरकर, नंदू दहिकरे पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.
कोट
अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येत असल्याची माहिती मिळताच वधूच्या वयाची चौकशी करून सर्वांना ताब्यात घेतले. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
- विलास कुलकर्णी, ठाणेदार, धारणी पोलीस ठाणे