आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही मदत करू. आपण फक्त सहा महिने रक्कम जमा करा. जेवढी रक्कम जमा होईल, त्याच्या दुप्पट रकमेचे कर्ज खातेदारांना पुरवू, असे कर्मिक्षा बँकेने खातेदारांना सांगितले होते. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फेरीवाल्यांनी गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अधिकृत चार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात कमीत कमी ८०० ते ४४ हजारांची गुंतवणुक तक्रारदारांनी केली असून, इतरांची लाखांच्या वर रक्कम आहे. फेरीवाल्यांना कर्मिक्षा निधीचा पर्याय योग्य वाटल्याने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान त्यांनी या बँकेत कर्जखाते उघडले. औरंगाबादला या बँकेचे मुख्यालय, तर राधानगरात अमरावती शहरातील शाखा आहे. हे प्रकरण सध्या चौकशीत ठेवले आहे. गुन्हा दाखल झाल्यास बँकेच्या संचालकांची चौकशी होऊ शकते. दरम्यान, जमा असलेली रक्कम परत करा, अशी आमची मागणी असल्याचे खातेदार जगदीश श्रीवास यांनी पोलिसांना सांगितले.
कोट
तीन ते चार जणांची तक्रार प्राप्त आहे. आणखी तक्रारी वाढू शकतात. या तक्रारी एकत्र करून बँकेच्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याच्या परवानगीकरिता प्रकरण पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात येईल.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर