अमरावती जिल्ह्यातील इस्माईलपुरा (हिवरखेड, ता. मोर्शी) आदिवासी गावात नागरिकांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. मतदान मात्र ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा प्रतिनिधी घेतात. इस्माइलपूर गाव हिवरखेड ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करावे, करिता ता १५ जुलै रोजी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात माजी उपसभापती माया वानखडे यांनी जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदन दिले.
इस्माइलपूर आदिवासी गाव ३०० लोकवस्तीचे आहे. सर्व आदिवासी समाजाचे मंजूर असून कामाला जाऊन पोटाची खळगी भरतात. भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. परंतु येथील आदिवासी आजही गुलामगिरीत असल्यासारखे जीवन जगत आहे. यापूर्वी अनेक तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यात. पं.स. जि.प. अमरावती सी.ई.ओ यांच्याकडून शासनास ठरावपत्र देण्यात आल्याची नोंद आहे, असे डॉ. अनिल बोंडे व अधिकृत सूत्रांनी सांगितले. या गावात पिण्याचे शुद्ध पाणी नाही. एका जुनाट खड्ड्यातून विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागते. घरकुल, आरोग्य, मोफत धान्य शासनाच्या कोणत्याच योजना नाही. जगाच्या पाठीवर असे गाव मिळणार नाही. संबंधित शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. बोंडे, माया वानखडे, माया खडसे, अलका कुमरे व गावकऱ्यांनी केली आहे.