अमरावती : जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये नागरिकांना मतदानाच हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित क्षेत्रातील मतदारास सुटी, कामात सूट किंवा विशेष रजा देण्याविषयीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने उद्योग विभागाचे प्रधान सचिवांना दिले आहेत.
जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये राहणारे बहुतांश मतदार हे नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, एमआयडीसी आदी ठिकाणी ये-जा करतात, त्या मतदारांना विशेष रजा दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते, त्यामळेच आयोगाने आदेश दिले आहेत.
यानुसार संबंधित क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी द्यावी, तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुटी किंवा विशेष रजा देण्यात यावी. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.