अमरावती : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८२ टक्के कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ९८ टक्के वाटप केलेले असताना राष्ट्रीयीकृत बँका ७४ टक्क्यांवरच स्थिरावल्या आहेत. यंदाचे खरिपाचे कर्जवाटप संपल्याने आता बँकामध्ये रबीच्या कर्जवाटपाची लगबग होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, यंदाचे खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १२०१.११ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी आतापर्यंत १,०२,९२१ खातेदारांना ९८८.२६ कोटींचे पीक कर्जवाटप केले आहे. ही ८२ टक्केवारी आहे. यापूर्वी २०१५-१६ चे हंगामात ६५ टक्क्यांपर्यत कर्जवाटप केले होते. त्यानंतर यंदा विक्रमी उच्चांकी कर्जवाटप असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला कर्जवाटपाचा टक्का माघारला होता. मात्र, कर्जमाफीनंतर दीड लाखांपर्यत कर्ज झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला. या सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बॉक्स
असे आहे बँकानिहाय कर्जवाटप
राष्ट्रीयकृत बँकाना ६८१.१० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात ५२,८१८ शेतकऱ्यांना ५८०.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ही ७४ टक्केवारी आहे. बँकद्वारा १५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १२.२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ८१ टक्केवारी आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ४०५ कोटींचे लक्ष्य असताना ४९,०८२ शेतकऱ्यांना ३९५.७४ कोटींचे वाटप केले. ही ९८ टक्केवारी आहे.