अमरावती : समाजाच्या सर्वांगीण विकासाचा तसेच प्रगतीचा मूळ पाया असलेल्या शिक्षणपद्धतीकडे व शिक्षणपद्धतीचा मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने सहेतुक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यामुळे शिक्षणक्षेत्राला समस्या भेडसावत असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परषिद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर यांनी व्यक्त केले.यवतमाळ येथे पार पडलेल्या शिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. वेतनेत्तर अनुदान बंद करण्यात आल्यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गात अवरोध निर्माण झाला असून हा अवरोध दूर करण्यासाठी व वेतनेत्तर अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही भोयर म्हणाले. विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर असताना उमेदवारांच्या प्रचाराची मोहीम जोर धरत आहे. यात इतर उमेदवारांपेक्षा शेखर भोयर यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सकाळी ७ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत मतदारांशी त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याने त्यांच्या प्रचार मोहिमेचा विरोधकांनी धसका घेतला आहे. पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करणार असले तरी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १७ हजार मतदार असल्याने सर्वच उमेदवारांचे लक्ष अमरावती जिल्ह्यावर आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून शिक्षकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे शेखर भोयर यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरत आहे. कुठल्याही विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित न करता सर्वच शिक्षकांच्या समस्या हिरिरीने सोडविण्याचा प्रयत्न भोयर यांनी केला असल्याचे शिक्षक सांगतात. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे बॅनर शिवाजी शिक्षण संस्थेतील मते त्यांच्या बाजूने वळण्यासाठी मदत करीत असल्याचे पुढे येत आहे.
शैक्षणिक समस्यांना शासनाचे धोरण जबाबदार- शेखर भोयर
By admin | Updated: June 16, 2014 23:14 IST