परतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागातील नागरिकांच्या सुविधेकरिता धारणी येथे शासकीय रक्तपेढी सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार केवलराम काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
मेळघाटात मोठ्या प्रमाणात सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे प्राणसुद्धा जात आहेत. धारणी तालुक्यापासून १५० किमी अंतरावर शासकीय रक्तपेढी आहे. मेळघाटातील आदिवासी नागरिकांना रक्ताची कमतरता भासते तेव्हा वैद्यकीय अधिकारी रुग्णांना अमरावती येथे पाठवतात. आकस्मिक प्रसूतीच्या वेळी रक्ताची गैरसोय झाल्याने व अपघाताच्या वेळी प्रवासामध्ये रुग्णालयात पोहचण्याच्या आधी रुग्ण दगावल्याचे चित्र मेळघाटमध्ये बरेचदा पाहायला मिळाले. त्याच्या अनुषंगाने धारणी येथे शासकीय रक्तपेढी तयार करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केेवलराम काळे यांनी केली. या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टरांची नियुक्ती करावी, असे साकडेदेखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना घातले आहे.