लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवंशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने सुमो वाहनाला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रिंंगरोडवरील नवसारी चौफुलीवर घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातात सुमो चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. विश्व हिन्दू परिषदेचे सागर खेडकर व बजरंग दलाचे कार्यकर्तेसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी गोवंश वाहतुकीसंदर्भात आक्रमक पवित्रा घेऊन पोलिसांना जाब विचारला. पोलिसांच्या निगरगट्ट भूमिकेमुळे शहरात गोवंशाची वाहतूक सर्रास सुरू आहे. मागील काही दिवसांत पोलिसांनी कागदोपत्री थातूरमातूर कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी रहाटगावकडून लालखडीकडे जाणारा भरधाव ट्रक क्रमांक एम.पी.०९ के.सी.-९०९२ ने नवसारी चौफुलीवर सुमो क्रमांक एम.एच.-२७ ए.सी.-०५८३ ला जबर धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. कधी थांबणार गोवंश वाहतूक?अमरावती : अपघातात सुमो वाहनातील जयंत भीमराव लोखंडे (३३,रा.महेंद्र कॉलनी) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना काही नागरिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, घटनास्थळावर उपस्थित काही नागरिकांनी ट्रकची झडती घेतली असता व ट्रकवरील ताडपत्री उघडून पाहिली असता ट्रकमध्ये ३५ ते ४० जनावरे कोंबून नेली जात असल्याचे दिसून आले. गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यासह पीएसआय एस.पी.राऊत यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून स्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यानच काही नागरिकांनी ट्रकवर चढून जनावरांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी ट्रकवरील ताडपत्री काढून घेतली. पोलिसांनी मज्जाव केला असता परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी जनावरांना दस्तूरनगरातील गौरक्षणस्थळी पाठवून ट्रक जप्त केला आहे. गोहत्याबंदी लागू झाल्यानंतरही शहरात जनावरांची वाहतूक व हत्याकांड सुरूच आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. शहराच्या चारही दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर पोलीस लक्ष ठेऊन असले तरी गोवंश वाहतूक करणारे पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा गैरप्रकार करीत आहेत. यामुळे गोवंश वाहतूक कधी थांबणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दस्तुरनगरात तणावगोवंशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी थेट दस्तुरनगरातील गौरक्षणात नेले. यावेळी शेकडो नागरिकांसह हिन्दू संघटनांचे काही पदाधिकारी सुद्धा तेथे पोहोचले होते. त्यांनी जनावरांची पाहणी केली असता त्यांना निर्दयतेने कोंबून नेले जात असल्याचे दिसून आले. यापैकी काही जखमी गार्इंचा मृत्यू झाल्याचे सुद्धा दिसून आले. हा गंभीर प्रकार बघताच नागरिकांसह हिन्दू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक नांदगाव पेठमार्गे शहरात शिरला. रिंगरोडवरून तो नवसारीपर्यंत पोहोचला. नांदगाव पेठ येथेच ट्रकची तपासणी केली असती तर अपघात टळला असता. त्यामुळे पोलिस तैनात असतांनाही हा प्रकार कसा घडला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्नट्रकमध्ये गोवंशाची जनावरे दिसून येताच नागरिकांचा संताप अनावर झाला. काही नागरिकांनी ट्रकवर चढून ताडपत्री फाडून ट्रकवरील आवरण मोकळे केले. काहींनी ट्रकची तोडफोड करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करून नागरिकांची समजूत घातल्यावर नागरिकांचा रोष शांत झाला. दंगा नियंत्रण पथकाला पाचारणअपघातस्थळी तणावाची स्थिती बघता दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. बंदुकधारी कमांडोंनी जमावाला पांगवून तणावाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविले. अपघातानंतर नवसारी चौफुलीवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
अपघातातून उघड झाला गोवंश वाहतुकीचा धंदा
By admin | Updated: May 24, 2017 00:04 IST