बाराही महिने कार्यालय बंद : कशाचा मिळतो अधिकाऱ्यांना पगार?दर्यापूर : येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. पण हे कार्यालय बाराही महिने बंद अवस्थेतच असल्यामुळे येथील इमारत ही शोभेची वास्तू बनली आहे. तर मग येथील अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्यांना चारअंकी पगार कशासाठी, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. दर्यापूर तालुका हा खारपाणपट्टा असल्यामुळे तालुक्यात कोरडवाहू शेती आहे. या शेतातील पिकांची नासाडी रानडुक्कर, हरिणांचे कळप, माकडे आदी वन्यप्राणी करतात. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रार करायची असेल, समस्या मांडायची असल्यास अधिकारी मुख्यालयात हजर नसतात. वनपाल व वनरक्षकांकडे दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर ताुलक्यातील काही गावे असल्यामुळे दर्यापुरात ते अमावस्या, पौर्णिमेलाच ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पंचायत समितीलगत हे कार्यालय आहे. त्यामुळे अशा अधिकारी- कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संबंधित संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडले मुख्यालय वाऱ्यावर
By admin | Updated: September 25, 2016 00:27 IST