पंकज लायदे/धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सवंगणी झालेले सोयाबीन शेतात कुजले. शेंगांना कोंब फुटले असले तरी यामध्ये काहीतर मिळेल, या आशेपोटी शेतकरी कुजलेले सोयाबीनचे गंज जमा करीत असल्याचे तालुक्यातील जळजळीत वास्तव आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असलेले आदिवासी बांधवावर यंदा परतीच्या पावसाने कुटाराघात घातला.शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली. त्या अस्मानी संकटात भर पडली ती परतीच्या पावसाने. १ ऑक्टोबरपासून सलग महिन्याभर धारणी तालुक्यात पाऊस मुसळधार कोसळला. त्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी शेतकºयांना सवडच मिळाली नाही. तीन दिवसांपासून उघाड असल्याने सोयाबीन शेतातच सवंगून ठेवण्यात आले. मात्र, कालपरवाच्या पावसाने गंजीतील सोयाबीनला कोंब फुटले. ते कुजले. दुसरीकडे कापसाच्या वाता झाल्या आहेत. बोंडे सडली. फुटून कापूस बाहेर पडला; मात्र पावसाची संततधार लागल्याने कापूस वेचता आला नाही.अशी आहे परिस्थिती‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात दहेंडा येथील आकाश जावरकर याची भेट घेतली. त्याच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. आई, वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ असे पाच जणांचे कुटुंब आहे. आकाशने मोठ्या भावाला पुण्याला एका कंपनीत कामाला पाठविले. त्याने मशागतीसाठी २५ हजार रुपये पाठविले. त्यातून तीन एकरांत सोयाबीन पेरले. १८ नोव्हेंबरपासून परतीच्या पावसाने सोंगलेले सोयाबीन जमिनीवरच पड़ून राहिले. त्यातच उन्ह पडल्याने मंगळवारी त्याची उलथापालथ करण्यात आली. सोयाबीन पूर्ण काळे पडले आहे. परतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिसकला. आता रबीची पेरणी कुठल्या भरवशावर करावी, असा त्यांचा सवाल आहे. मायबाप सरकारने शेतांचे पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, असे मत आकाशने व्यक्त केले.
कुजलेल्या सोयाबीनमध्येही आशेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST