आदिवासी महिलांचा पुढाकार,
परतवाडा : मेळघाटात ‘विकेल ते पिकेल’ हा उपक्रम आदिवासी महिलांनी यशस्वी केला आहे. यात त्या स्वतः राबत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात स्वकष्टाने त्या भाजीपाल्यासह पिके घेत आहेत.
परतवाडा ते धारणी रोडवर हरिसालपुढे चित्री गावालगत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र त्यांनी शेतालगत उभारले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या केंद्राला भेट दिली.
संतशिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत हे विक्री केंद्र चित्री येथील कणासे कुटुंबीयांकडून थाटले गेले. थेट शेतातून ताजा भाजीपाला काढून या केंद्रामार्फत ते ग्राहकांना विकत आहेत. विक्री केंद्रावरील भाजीपाला ग्राहकांना त्या शेतातही बघायला मिळत आहे.
या विक्री केंद्रावरील ताज्या भाजीपाल्याकडे पर्यटकांसह स्थानिक रहिवासी व परतवाडा-धारणी मार्गाने ये-जा करणारे आकर्षित होत आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर मेळघाटच्या अभ्यास दौऱ्यावर असताना, पुढे गेलेले वाहन त्यांनी मागे घेतले. वाहनातून उतरून त्या विक्री केंद्राकडे गेल्यात. विक्री केंद्रावर असलेल्या कष्टकरी आदिवासी महिलांशी त्यांनी संवाद साधला. विक्री केंद्रासह त्यांच्या शेतीचीही पाहणी केली. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत त्यज्च्याकडील भाजीपाला विकत घेतले.