अमरावती : पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त होता. दरम्यानच्या काळात दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर काही दिवस उलटत नाहीत तोच सोमवारपासून पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. संततधार पावसामुळे पेरलेले बियाणे दडपण्याची शक्यता असते. पावसाचे पाणी शेतात साचल्याने मातीचा थर बियाण्यांवर पसरून बियाणे नाश पावतात. बियाण्यांना अंकुर फुटत नाहीत. उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी नुकतीच आटोपली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम सोयाबीनवर होऊ शकतो. सोयाबीनचे बी ४ से.मी.पेक्षा अधिक खोल नको. मात्र, वेगवान पावसामुळे या पेरलेल्या बियाण्यांवर मातीचा थर साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरीच्या उत्पादनावर मात्र या पावसामुळे विशेष दुष्परिणाम संभवत नाही. उगवत्या पेरणीसाठी मात्र हा पाऊस नुकसानदायी सिध्द होऊ शकतो. दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर येऊ शकते, अशी माहिती किटकतज्ज्ञ राजेंद्र जाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
शेतकरी पुन्हा संकटात
By admin | Updated: July 23, 2014 23:23 IST