प्रशासनावर रोष : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अमरावती : राज्य शासनाकडून ग्रामस्तरावर विकास कामांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार्या जनसुविधेच्या निधी वाटपाचा प्रश्न अध्यक्षांच्या निर्देशानंतरही प्रशासनाने निकाली काढला नाही. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत स्थायी समितीच्या सदस्यांनी सभागृहातून बहिर्गमन करुन प्रशासनावर संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेला शासनकडून जिल्हय़ातील विविध जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनसुविधेची कामे करण्यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी जिल्हा परिषदेने पंचायत समिती स्तरावर पाठविला आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीवरुन ग्रामपंचायत स्तरावर जनसुविधा योजनेंतर्गत विविध विकासकामे केल्या जातात. मात्र ही कामे करताना पंचायत समिती स्तरावरुन मंजूर झालेल्या कामाच्या प्रगतीनुसार विविध टप्प्यात निधी संबंधित कंत्राटदारास उपलब्ध करुन दिला जातो. प्रत्येकी दोन टप्प्यात ४0 आणि अखेरच्या टप्प्यात २0 याप्रमाणे विकास कामाचा निधी पंचायत समितीमार्फत दिला जातो. मात्र ग्रामपंचात स्तरावर जनसुविधेची कामे सुरु असताना विकासकामांचा निधी हा विविध टप्प्यात न देता तो एकाचवेळी १00 टक्के प्रमाणात देण्याची मागणी मागील स्थायी समिती सदस्यांनी रेटून धरली होती. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी सदस्यांच्या मागणीनुसार हा निधी वाटप करण्याचे निर्देश सभेत दिले होते; मात्र अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाची प्रशासनाने अंमलबजावणी न करता जनसुविधेचा निधी एकाच वेळी पूर्ण देण्यास नकार दिला.
जनसुविधेच्या मुद्यावर सदस्यांचे बहिर्गमन
By admin | Updated: May 27, 2014 00:20 IST