नैसर्गिक आपत्ती कक्ष : प्रशासकीय यंत्रणेद्वारा पूरबाधित क्षेत्राचा मागोवा अमरावती : मागील आठवड्यात झालेला अतिवृष्टीचा पाऊस आणि २७ जुलै रोजी महापुराच्या तडाख्याने संकटात सापडलेल्या नागरिकांच्या शोध बचाव पथकात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे जवान अद्यापही जिल्हा मुख्यालयात असलेल्या नैसर्गिक आपतकालीन कक्ष येथे सुटीच्या दिवशीही तळ ठोकून असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारला असता दिसून आले. अतिवृष्टीमुळे पुराचा तडाख्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वित्त व प्राणहाणीच्या घटना घडल्या. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे या संकटात सापडलेल्या नागरिकांच्या बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपतकालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २७ जुलै रोजी पूर्णा प्रकल्पाचे पाणी कुठलीही पूर्वसूचना न देता नऊही दारे उघडल्यामुळे नदी काठावर असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी, विश्रोळी, काजळी, देऊरवाडा, थुगाव पिंप्री, कुरळपूर्णा, धानोरा, राजना, तुळजापूर गढी, आसेगाव पूर्णा आदी गावांमध्ये हाहाकार उडाला. दरवेळी धरणाची दारे उघडताना त्याची पूर्वसूचना संबंधित गावांना देण्यात येते. मात्र यावेळी काही गावांना याची कुठलीही माहिती नव्हती.
आपात्कालीन शोध बचाव पथक अॅलर्ट
By admin | Updated: July 29, 2014 23:33 IST