वरुड : शहराला दोन भागात विभागणारी चुडामण नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीत प्लास्टिक पिशव्यांचा खच पडून आहे. नदीला प्लास्टिकचे आवरण असल्यासारखी अवस्था झाली. नदीतील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परंतु याकडे स्थानिक नगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहराला दोन भागात विभागणारी चुडामण नदी शहरातून वाहते. यामुळे शनिवारपेठ आणि मुख्य वस्ती असे दोन भाग झाले आहे. शहरातील सर्व नाल्यांचे घाण पाणी या नदीत आणून सोडल्याने नदीत प्लास्टिक पिशव्या आणि टाकावू वस्तू धनगवळी बाबा मंदिर परिसरातील नदीच्या पाण्यात तरंगतांना दिसतात. साने गुरुजी कॉलनीपासून आंबेडकर चौक डवरगाव रस्त्यापर्यंत लांब आहे. यामध्ये केदारेश्वर मंदिर, धनगवळी बाबा मंदिर, दोन मशिदी, नाथ मंदिर केदारेध्वर मोक्षधाम आणि अमरधाम सुध्दा याच नदीकाठी आहे. एकेकाळी पवित्र असणारी नदी बारमाही वाहत होती. नदीत मुले उन्हाळ्याच्या दिवसात पोहण्याचा मनमुराद आनंद येथील नागरिक घेत होते. महिला कपडे धुण्यासाठी याच नदीवर येत होत्या. मंगळा गौर, गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जनसुद्धा नदीत केले जात होते. परंतु घाणीच्या ेसाम्राज्याने कळस गाठल्याने या नदीचे पौराणिक महत्त्व कमी झाले आहे. चवथ्या व पाचव्या शतकातील घनदाट अरण्यातून वाहणारी नदी मध्यवस्तीत आल्याने सिमेंटच्या जंगलासह शहरातील घाणपाण्याला नदीत सामावून घ्यावे लागते. परंतु चुडामण नदीच्या स्वच्छतेकडे स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने कधीही लक्ष दिले नाही. दोन वर्षांंपूर्वी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सफाई अभियान राबविले होते. मात्र यानंतर ही मोहीम राबविण्यात आली नाही. नगरपरिषदेची जबाबदारी असताना नदीत घाणीचे साम्राज्य पसरणे ही शेकांतिका आहे. जून पासून पावसाळा सुरु होत असल्याने साथीचे आजार सुरु होतात. सन २0१0 पासून सतत विषाणुजन्य आजाराचे सावट शहरासह तालुक्यावर असते. चार वर्षांंत अनेकांना विषाणूजन्य आजाराला बळी पडावे लागले. क्षणिक मोहीम राबविण्याचा तुटपुंजा प्रयत्न करुन वेळकाढू धोरण आखण्यात येते. परंतु नियमित लक्ष याकडे दिल्यास नदीतील घाणीचे साम्राज्य संपेल. आणि शहराच्या सौंदर्यात भर पडेल. यामुळे नगरपरिषदेने यावर त्वरित उपाययोजना करुन नदीची साफसफाई मोहीम जून महिन्यापूवर्ी राबविल्यास नागरिकांच्या आरोग्यास होणारा संभाव्य धोका टळेल. याकडे नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. चुडामण नदीची पालिका प्रशासनाने स्वच्छता केली नाही तर शहरवासीयांतर्फे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरुड येथील चुडामण नदीला घाणीचा विळखा
By admin | Updated: May 22, 2014 00:47 IST