चांदूरबाजार : स्थानिक एसटी महामंडळाच्या आगारात भंगार गाड्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना याचा त्रास होत आहे. धक्का प्लेट गाड्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला पोहचता आले नाही. या आगारात जिल्ह्यात सर्वाधिक ७००० च्या जवळपास विद्यार्थी पासेस आहे. हजारो विद्यार्थी चांदूरबाजार येथे ये-जा करीत असतात. एसटी महामंडळाने चांदूर आगारातून ग्रामीण बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या आगारातील ७० टक्के गाड्या भंगार झाल्यात. यामुळे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीसाठी आगारातील भंगार गाड्यांना पाठवावे लागते. विद्यार्थी आणणाऱ्या या बसेस अनेकदा बंद पडतात. कित्येक गाड्यांना विद्यार्थ्यावर धक्का देण्याची वेळ येते. परीक्षा काळात तसेच इतर वेळी मधातच गाडी बंद पडली तर विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडते. या आगारातून घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगाव, मासोद, आसेगाव, बेलोरा, जवळा, तळवेल, देऊरवाडा येथून विद्यार्थी ये-जा करतात.स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाकरिता विद्यार्थ्यांना सकाळी घरून निघावे लागते. अशातच एक एसटी बस अमरावती मार्गावर पेट्रोलपंपासमोर विद्यार्थी येत असताना अचानक एसटी बंद पडली तर या एसटीला लोटण्याकरिता वाहकाने चक्क विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवून धक्का मारायला लावले व स्वत: वाहक आपल्या मोबाईलवर लागले होते.
दे धक्का गाडीमुळे विद्यार्थी स्वातंत्र्य दिनापासून वंचित
By admin | Updated: August 17, 2015 00:04 IST