संशयास्पद : विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा करण्यात आला दावाअमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला. तरीही त्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले नाही. सागरचे शवविच्छेदन न करण्यामागे काय कारण होते, हे गुढ उकलणे आता महत्त्वपूर्ण झाले आहे. तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा सागर पात्रे हा विद्यार्थी शंकर महाराज यांच्या आश्रमात शिकायला होता. पुजादी कार्यात तो जादाकाळ रमायचा. महाराजांच्या सेवेत तो असायचा. १ सप्टेंबर २००६ रोजी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान सागर अत्यवस्थ अवस्थेत आढळला. सागरला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याची अशी अवस्था झाल्याचे आश्रमातील लोकांनी सागरच्या थोरल्या भावाला सांगितले. विजेचा धक्का कसा लागला याबाबतची माहिती रंजक आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक इलेक्ट्रिक डोअरबेलची विद्युतभारीत वायर लोंबकळत होती. मुख्य द्वाराजवळून येताना सागरच्या डोक्याला त्या वायरचा स्पर्श झाला. वायरमधील धातुच्या उघड्या तारांचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे सागरला विजेचा धक्का लागला, अशी माहिती देण्यात आली. सागरला उपचारासाठी अमरावतीपर्यंत हलविताना त्याचा मृत्यू झाला. सागरचा मृत्यू झाल्याचे कारण नैसर्गिक नव्हतेच. सागरला अखरेचा उपाय म्हणून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. नियमानुसार, अशा मृत्युनंतर शवविच्छेदन करण्यात येते. शवविच्छेदनादरम्यान मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांकडून कळू शकेल, हा त्यामागचा उद्देश असतो. सागरचा मृत्यू खरेच विजेच्या धक्क्याने झाला की आजार, विषप्रयोग, मार, दुखापत अशी इतर कारणे मृत्युमागे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. गरज भासल्यास शरीरातील काही अवयवांचे नमुने (व्हिसेरा) शास्त्रीय तपासणीसाठी उच्च तंत्रज्ञात उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. रासायनिक तपासणी करून डॉक्टर्स मृत्यूचे नेमके निदान करीत असतात. या प्रक्रियेला सागरच्या मृत्यूनंतर छेद देण्यात आला. शोधमोहिमेदरम्यान 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सागरसोबत असलेल्या आश्रमातील काही लोकांनी शवविच्छेदन होऊ न देण्यासाठी शक्य तो सर्व प्रभाव वापरला. त्या प्रभावामुळेच शवविच्छेदन टाळले गेले. आश्रमात शिकण्यासाठी असलेल्या सागरचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असतानाही त्याचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही? सागरचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला काय? त्याचा पुरावा काय? त्यावेळी सागरसोबत आश्रमातील कोण लोक होते? सागरला धामणगावच्या खासगी रुग्णालयात का नेण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी चौकसपणे शोधल्यास अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा होईल. उल्लेखनीय असे की, सागरसंबंधीच्या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही दुजोरा दिला आहे. त्यांच्या स्वतंत्र तपासातदेखील हीच तथ्ये पुढे आली आहेत.
मृत्यू अनैसर्गिक तरीही टाळले शवविच्छेदन
By admin | Updated: September 17, 2016 00:15 IST