अमरावती : पर्यावरणाचा ऱ्हास आणि जमिनीची धूप थांबावी यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना हाती घेतली आहे. मात्र जिल्ह्यात जागा आणि मजुरांच्या अभावामुळे या योजनेचे उद्दीष्टे गेल्या चार वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. सामाजिक वनिकरण विभागाच्या आकडेवारीवरुन ते स्पष्ट होते.पर्यावरणाचे संतुलन राखणे, ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात सामाजिक वनिकरण विभागाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक विभागाला वृक्षारोपणाचे उद्दीष्ट दिले जाते. या योजनेला जिल्ह्यात सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु आता शासनाच्या इतर योजनांप्रमाणे ही योजनाही बारगळली असून केवळ उद्दीष्ट देवून सामाजिक वनिकरण विभाग आपसी जबाबदारी इतर विभागांवर ढकलत असल्याचे चित्र आहे. यंदा तर या योजनेकडे सर्वच विभागांचे दुर्लक्ष झाले असून अद्याप उद्दीष्टांच्या २५ टक्के वृक्षांचेही रोपण झालेले नाही. शतकोटी वृक्षलागवड योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी पावसापूर्वीच म्हणजे एप्रिल ते मे महिन्यात खड्डे खोदले पाहिजे. परंतु हे काम जून, जुलै महिन्यात ही योजना बारगळी असून दुसरीकडे या योजनेवर कोट्यवधीचा खर्च होत आहे. सामाजिक वनिकरण विभागातर्फे शतकोटी योजनेंतर्गत ठरविण्यात आलेले वार्षिक उद्दीष्ट सलग चार वर्षे पूर्ण होवूनही होवू शकले नाही. जागा मिळेल तेथे वृक्षारोपणाचा प्रयत्न होत आहे. सामाजिक वनिकरण विभागाकडे जागा व मजुरांचा अभाव असल्याने उद्दीष्टपूर्ती होवू शकत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
शतकोटी योजना उद्दिष्टपूर्तीपासून दूर
By admin | Updated: August 17, 2014 22:54 IST