अमरावती : शहरातील प्रमुख असलेल्या सायन्सकोर मैदानात दरवर्षी किंवा वर्षा-दोन वर्षातून एकदा उन्हाळ्यात आनंदमेळा लागतो. सध्या हा आनंदमेळा अमरावतीकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलाय. विशेषत: बच्चे कंपनी या मेळ्यातील खेळणी आणि खाद्यपदार्थ मस्त एन्जॉय करीत आहेत. मात्र, कुटुंबीयांसमवेत या आनंदमेळ्यात वेळ घालविण्यासाठी येणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजकांनी कोणतीच पूर्वतयारी केली नसल्याने याठिकाणी केव्हाही आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. सायंस्कोर मैदानातील या आनंदमेळ्यात मोठमोठे, आकाश पाळणे, मशिन्सवर चालणारे अत्याधुनिक विदेशी झुले व अन्य मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल आहे. परंतु ऐनवेळी उदभवणार्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आयोजकांनी कोणतीच सुरक्षेची सोय केलेली दिसत नाही. त्यामुळे हा मेळा नागरिकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला मिळेल त्या पध्दतीने मनोरंजन हवे असते. नेमकी हीच वेळ साधून व्यवसाच्यादृष्टीने आनंदमेळा शहरात येतो. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास या मेळ्यात प्रचंड गर्दी असते. आकाशपाळण्यात बसून थरारक अनुभव घेण्याची अनिवार इच्छा अनेकांना होते. लहान मुले, महिला आणि वृध्द या आकाशपाळण्यात बसतात. परंतु पाळणा वेगात वर गेल्यानंतर पोटात भीतीचा गोळा उठतो आणि अनेकजण भीतीपोटी खाली उतरण्याचा प्रयत्न करतात. या आकाश पाळण्यांना कठडे नसल्याने केव्हाही मोठा अपघात संभवतो. इतर खेळण्यांमध्येही सुरक्षिततेची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्षणाचे मनोरंजन जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे आनंदमेळ्याचे आयोजक, नागरिक आणि मेळ्याला परवानगी देणारी यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
‘आनंदमेळ्या’चा आनंद ठरू शकतो जीवघेणा!
By admin | Updated: June 9, 2014 23:21 IST