अमरावती : महाआवास अभियान ग्रामीण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ मोहीम राबविली जात आहे.
राज्यात १९ नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरिता सन २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत एकूण ९२७३१ एवढे लक्ष्यांकापैकी ६४५४४ घरकुल लाभार्थींना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, तर २८१८७ लाभार्थींना मंजुरी देणे बाकी आहे. मंजुरी बाकी असलेल्या लाभार्थींच्या प्रत्यक्ष गावात भेटी घेणे, घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, गावातील उपलब्ध शासकीय जागेची माहिती घेणे आदींसाठी पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांकडून घरकुुलदूत म्हणून एक दिवस सक्षम लाभार्थींची भेट घेऊन घरकुल मंजुरीकरिता प्रवृत्त करण्यासाठी ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविली जात आहे. घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याला येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढणे तसेच जागा उपलब्ध नसलेल्या भूमिहीन लाभार्थींसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामध्ये बक्षीसपत्राद्वारे, अतिक्रमण नियमाकुल करणे, ई-क्लास, एफ-क्लास जागा, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना आदी पर्यायांपैकी कुठल्याही पर्यायाद्वारे जागा उपलब्ध करणे शक्य आहे. याची पडताळणी या मोहिमेत करून यावर आठवडाभरात ग्रामपंचायतीकडून नियोजन घेणे हा उपक्रम घरकुल लाभार्थींसाठी राबविण्यात येत आहे.
बॉक्स
विहित नमुन्यात नोंदवा माहिती
घरकुलदूत म्हणून सहभागी झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत