संदीप मानकर - अमरावती : सव्वा वर्षापासून कोरोनाशी राज्यातील नागरिक लढा देत आहेत. असे असतानाही नागरिकांना शासकीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना काम पडतेच, कोरोना काळातही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच खाण्याचा मोह आवरला नाही. सन २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यात एसीबी ट्रॅप घटले असून, वर्षभरात ६३० एसीबी ट्रॅप, १२ अपसंपदा, तर अन्य भ्रष्टाचाराचे २१ प्रकरण असे ६६३ गुन्हे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केले आहे.
सन २०२१ मध्ये ८६६ सापळे, २० अपसंपदा, तर ५ गुन्हे अन्य भ्रष्टाचाराचे दाखल झाले असून, एकूण ८९१ गुन्हे नोंदविले गेले. यंदा १ जानेवारी त २३ मे २०२१ दरम्यान राज्यात पाच महिन्यांत ४११ सापळे दोन अपसंपदा, तर अन्य भ्रष्टाचाराचे १ असे एकूण ३०१ गुन्हे दाखल झाले आहे. सततचे लॉकडाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदा ट्रॅपमध्ये घट झाल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बॉक्स
लाचखोरीत औरंगाबाद विभाग अव्वल
१ जानेवारी ते २३ मे २०२१ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेता, पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातील आठही विभागात एकूण २९८ ट्रॅप यशस्वी झाले. त्यात लाचखोरीमध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक ६३ ट्रॅप यशस्वी झाले, तर सर्वात कमी २० ट्रॅप नांदेड विभागात झाले आहेत. ठाणे ३०, पुणे ५५, नाशिक ५४, नागपूर २७, मुंबई २२ असे ट्र्रॅप यशस्वी होऊन लाचखोरांना पोलिसांनी अटक केली. २९८ ट्रॅपमध्ये ४११ आरोपींचा समावेश आहे.
बॉक्स
अपसंपदाचे केवळ दोन गुन्हे
राज्यात पाच महिन्यात अपसंपदाचे केवळ दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यात तीन आरोपींचा समावेश आहे. अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा घडला असून, यात १० आरोपींचा समावेश आहे. एकूण ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार असे एकूण ३०१ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये ४२४ आरोपींचा समावेश असल्याची माहिती एसीबीने दिली.
बॉक्स
लाचखोरीत पोलीस विभाग अव्वल
यंदा लॉकडाऊनमध्ये काही कार्यालयांचे कामकाज १५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये झाले. कडक लॉकडाऊनमध्ये काही कार्यालये बंद होती. मात्र, महसूल व पोलीस विभागावर सर्वाधिक जबाबदारी होती. त्यामुळे पाच महिन्यात पोलिसांवर ६६ ट्रॅप झाले. दुसरा क्रमांक महसूल विभागाचा असून, ६० ट्रॅप झाले. त्यानंतर महावितरण २८, महानगरपालिका २४ ट्रॅप यशस्वी झाले. एकूण ७ कोटी ७६ लाख ३ हजार ७५० रुपये सापळा रक्कम जप्त करण्यात आली.