अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत ग्रामरोजगार सेवकांची प्रतीक्षा संपली असून, त्यांच्या माधनात वाढ करण्यात आली आहे. रोजगार सेवकांना प्रचलित पध्दतीनुसार कामाचे स्वरूप पाहून सहा टक्क्यांपर्यंत वाढ मिळणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतनिहाय एकूण निर्माण होणाऱ्या संचलित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रतिमाह एकत्रित मानधन देण्याचा निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने ८ मार्च रोजी घेतला. त्यानुसार वार्षिक व मासिक मानधन जाहीर करण्यात आले आहे. ७५० मनुष्य दिवस निर्मिती झाल्यास प्रचलित पध्दतीनुसार ६ टक्के एकूण कामाचे मानधन दिले जाणार आहे. तसेच ७५१ ते १५०० पर्यंत मनुष्य दिवस वार्षिक मानधन २४०० व मासिक मानधन दोन हजारापर्यंत राहणार आहे. १५०१ ते २५०० मनुष्य दिवस झाल्यास मानधन ३६ हजार व मासिक मानधन तीन हजार राहणार आहे. २५०१ ते चार हजार मनुष्य दिवस झाल्यास वार्षिक मानधन ४२ हजार आहे. ४००१ ते ५५०० मनुष्य दिवस झाल्यानंतर वार्षिक मानधन ४८ हजार व मासिक मानधन ४ हजार रुपये राहणार आहे. ५५०१ ते ७००० मनुष्य दिवसाची निर्मिती झाल्यास वार्षिक मानधन ५४ हजार व मासिक ४५०० असणार आहे. ७००१ ते ८००० मनुष्य दिवसाची निर्मिती झाल्यास ६० हजार रुपये वार्षिक आणि पाच हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. ८००१ ते ९००० मनुष्य दिवसाची निर्मिती झाल्यास ६८,४०० वार्षिक मानधन व ५७०० मासिक मानधन राहणार आहे. १० हजार मनुष्य दिवसाच्या पुढे प्रत्येकी एक हजार दिवसांपर्यंत ७०० रुपयांपर्यंत वाढ करून गणना केली जाणार आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामरोजगार सेवकांना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
यापूर्वी २.२५ टक्के मानधन
यापूर्वी एक हजार मनुष्य दिवस निर्मितीपर्यंत एकूण मजुरी पटानुसार केवळ २.२५ टक्के मानधन दिले जात होते. त्यात सुधारणा होऊन आता ६ टक्के मानधन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रोजगार सेवकांना दिलासा मिळाला आहे.