आरोग्य धोक्यात : महापालिकेचे ५५ नमुने अयोग्य संदीप मानकर अमरावती जिल्ह्यातील विविध विभागांच्यावतीने जिल्हा आरोेग्य प्रयोग शाळेत अणुजीव तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३ हजार ६१० पाणी नमुन्यांपैकी ४९५ नमुने दूषित आढळले. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालींवर प्रश्न चिन्ह लागले आहे. यामध्ये महापालिकेने तपासणीस पाठविलेले ५५ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.अमरावती महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, शासकीय व खासगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, जीवन प्राधिकरणने अनेक नमुने येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले होते. हे जर पाण्यामध्ये आढळून आले, तर जलजन्य आजार होतात. ते मानवी आरोग्याला अंत्यत घातक असतात. हे पाणी नमुने दूषित आढळल्यामुळे जिल्ह्यात टायफाईड, कॉलेरा, हागवण, कावीळ व इतर आजारांची लागण झाले आहे. याला नागरिक हैराण झाले असून पाणी निर्जंतुकीकरण केल्यानंतरच पिण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाणी नमुन्यांमध्ये महापालिकेचे ५५, विविध नगरपालिकेचे ९९, हॉस्पिटलचे ६३, प्राथमिक आरोग्य केंद्राचे २७२, जीवनप्राधीकरणचे ६ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. जीवन प्राधिकरणच्याही अनेक ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे सहा नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे विषाणूजन्य ताप व इतर आजारांची लागण झाली आहे. नागरिकांना पोटाचा आजार वाढू लागला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही रुग्णांची फुल्ल गर्दी झाली आहे. एप्रिल ते जून या महिन्यातील तपासणीसाठी आलेले हे पाणी नमुने असून त्यामुळे नागरिकांना आरोग्यासंदर्भात सर्तक राहण्याची वेळ आली आहे.४९५ पाणी नमुने तपासण्या नंतर दूषित आढळले आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार बाळवतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. - अरुण रौराळे,कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा
जिल्ह्यात विविध विभागांचे ४९५ पाणी नमुने दूषित
By admin | Updated: August 1, 2016 00:00 IST