अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडीपैकी २ हजार ६९३ ठिकाणीच पाण्याची सुविधा आहेत. मात्र, अजूनही ४७५ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे केंद्राबाहेरील बोअरवेल किंवा सार्वजनिक नळावरून तहान भागवावी लागते. अशातच आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्राला नळ जोडणी देऊन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडी केंद्रे आहेत. या ठिकाणी संबंधित गावांतील चिमुकल्यांना पोषण आहार दिला जातो. हा आहार शिजविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याकरिता ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्ररीत्या सुविधा नाही, अशा ठिकाणी केंद्रालगतच्या बोअरवेल, हँडपंप किंवा सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. आजघडीला जिल्ह्यात २६३९ पैकी २१६४ केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, १४ तालुक्यापैकी १० तालुक्यांतील ४७५ अंगणवाडी व बालवाडी केंद्रांमध्ये पाणी समस्या आहे. परिणामी बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जल जीवन मिशन अंर्तगत या केंद्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ जोडणी देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे.
बॉक़्स
तालुकानिहाय नळ जोडणी नसलेली केंद्रे
अचलपूर १३, अमरावती ८, अंजनगाव सुर्जी ८२, भातकुली ६१, चांदूर बाजार १६, चांदूर रेल्वे २, दर्यापूर १६४, चिखलदरा ३७, धारणी ६०, नांदगाव खंडेश्वर ३२, मोर्शी, तिवसा, धामनगांव रेल्वे आणि वरूड निरंक.
कोट
अंगणवाडी केंद्रांना पाणीपुरवठ्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून नळ जोडणी करून देण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतीने करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.
श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग